मुंबई |
कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात शेतकरी, तरुणवर्ग, महिला, कामगार, लघु-उद्योजक, दलित-आदिवासी, ओबीसींची तुलना अभिमन्यूशी करत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्याला सत्ताधाऱ्यांकडूनही जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं.
पंतप्रधान मोदी, अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उद्योगपती अंबानी आणि गौतम अदानी या सहा जणांनी आधुनिक चक्रव्यूह रचल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावरच आता भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आपल्या देशात पंतप्रधान हे लोकतांत्रिक पद्धतीने निवडले जातात. लिंग, वय, जात किंवा वर्ग पाहून पंतप्रधान निवडले जातात का?, आज ते असं म्हणाले, मग उद्या म्हणतील की वर्णावरून पंतप्रधान निवडले जातात. त्यांना लोकशाहीचा आदर नाही का? राहुल गांधी त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे दररोज संविधानाला दुखावत आहेत.”, असं खासदार कंगना रनौत म्हणाल्या आहेत.
पुढे कंगना यांनी म्हटलं की, “मला वाटतंय त्यांची टेस्ट झाली पाहिजे की ते ड्रग्ज घेतात का? ज्या स्थितीत ते संसदेत वाईट पद्धतीने भाष्य करतात, ते पाहून मला आश्चर्य वाटले. संसदेत त्यांनी म्हटलं की ही जी स्पर्धा आहे, ही शिवजींची वरात आहे आणि चक्रव्यूहात आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यांवरून वाटत नाही का, की त्यांची ड्रग्जची चाचणी झाली पाहिजे?”, असा खोचक सवाल कंगना यांनी उपस्थित केला.
“राहुल गांधी हे नशेत असतात किंवा…”
तसंच पुढे त्यांनी म्हटलं की, मला तर वाटतं की त्यांची तपासणी झाली पाहिजे. ते दारूच्या किंवा ड्रग्जच्या नशेत आहेत.कारण शुद्धीमध्ये असलेली व्यक्ती असं वक्तव्य करणार नाही, असा आरोपच कंगना यांनी केला आहे. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलंय.
दरम्यान, राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पाबाबतही टीका केली होती. अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये समाजातील 73 टक्क्यांचा म्हणजेच दलित, आदिवासी, ओबीसींचा समावेश नव्हता, असं राहुल गांधी म्हणाले.आधुनिक कमळरुपी चक्रव्यूहात अख्ख्या देशाची होरपळ सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलं.
0 Comments