पंढरपूर/प्रतिनिधी:
देशात सध्या जे काही वातावरण तयार झाले आहे. त्यावरून देशातील सामाजिक परिस्थिती ही मृतावस्थेकडे चालली असून देशात बेबंदशाही सुरू आहे अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पंढरपुरात केली.
माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी येथील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक, भागवताचार्य वा. ना. उत्पात, कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मोदी सरकार च्या काळात देशाची अर्थव्यवस्था घसरत आहे. सामाजिक शांतता नाही. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. अशा सगळ्या घटनेमुळे देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालल्याची टीका शिंदे यांनी केली.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, देशातील विरोधी पक्ष विस्कटलेला आहे. देशहितासाठी आता सगळया विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला त्यांनी पाठींबा दिला आहे.
सुशांत प्रकरणात सोशल मिडीयातून काही फेक अकाऊंट बनवून मुंबई पोलीसांची बदनामी केली. सोशल मिडीयाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला असून त्याचा वापर विचार करून करावा असा सल्ला शिंदे यांनी दिला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत बोलण्यास नकार दिला.
0 Comments